जिंदगी न मिलेगी दोबाराची सात वर्षे


पात्र १: कबीर

कबीरची फॅमिली कन्स्ट्रक्शनमध्ये आहे, अर्थात तोही. नताशा, ही त्याची फॅमिली फ्रेंड. त्याने तिला प्रपोज केलं आहे, पण तेही एका वेगळ्याच सिच्युएशनमध्ये. तो निर्णय घेतल्यानंतर बदललेल्या नताशाला तो टॅकल करू शकत नाहीये.  एकंदर, तो या लग्नाने खुश नाहीये, पण 'कार्ड्स बट चुके हैं, फॅमिलीज इनवोल्व्ह हैं' वगैरे नैतिक गोष्टीत तो अडकून पडलाय. कदाचित म्हणूनच ही ट्रिप त्याच्यासाठी महत्वाची आहे.

पात्र २: अर्जुन

अर्जुन एक स्टॉकब्रोकर आहे. प्रचंड वर्कोहॉलिक, त्याला श्वास घ्यायलादेखील फुरसत नाहीये. कमी वयात स्वतःच्या मर्यादा ताणून शक्य तेवढे पैसे कमवून चाळीशीत रिटायर व्हायचा त्याचा प्लॅन आहे. यात आधीच त्याने आपल्या एका गर्लफ्रेंडची आहुती दिली आहे. पैसा म्हणजे आनंद आणि आनंद म्हणजे पैसा हे त्याचे ब्रीदवाक्य. पैसा, हे एकच प्रमेय आयुष्यातील सर्व गणिते सोडवतो असे त्याचे मत. तो ट्रिपला यायला तयार होतो, तेही डोक्यावर कामाचं ओझं आणि खांद्याला लॅपटॉप लटकावून.

पात्र ३: इम्रान

इम्रान, एक कॉपीरायटर आहे. पोटासाठी ऍड, जिंगल्स बनवणे आणि स्वतःसाठी कविता लिहिणे हे त्याचे काम. स्पेनच्या ट्रिपदरम्यान तो स्वतः एका सिक्रेट मिशनवर आहे, स्वतःच्या बायोलॉजिकल फादरला शोधण्याच्या. आपल्या आईने ही गोष्ट आपल्यापासून जाणूनबुजून लपवून ठेवलेली आहे आणि त्याच्या खऱ्या वडिलांची काहीतरी बाजू असू शकते, असे त्याला वाटत असते.

'जिंदगी ना मिलेगी दोबारा' मध्ये झोयाने ही तीन मध्यवर्ती पात्रे निवडली. कबीर, अर्जुन आणि इम्रान. तिघांचं कौटुंबिक आणि मानसिक बॅकग्राऊंड, व्यवसाय आणि स्वभाव वेगळे आहेत. वेगवेगळ्या सीन आणि डायलॉग्समध्ये प्रत्येकाचे कॅरेक्टर्स समोर येत राहतात. एक साधासा ओपनिंग क्रेडीट्सचा सीन, जिथे अर्जुन शिस्तबद्धपणे व्यवस्थित घडी करून ठेवलेले कपडे आणि इतर सामान आपल्या बॅगेत भरताना दाखवलाय, तर इम्रान आहे तसे कपडे बॅगेत कोंबताना. अगदी परस्परविरोधी

ही ट्रिप तिघांसाठीही वेगवेगळ्या प्रकारे लाईफ चेंजिंग अपोर्च्युनिटी कशी ठरते, याची अनुभूती म्हणजे 'जिंदगी न मिलेगी दोबारा'. तसा, पूर्ण चित्रपट लक्षात राहणारा आणि एकेक फ्रेम नजरेत सामावून घ्यावी अशी, पण या चित्रपटातील काही अत्यंत महत्वाचे सीन्स, ज्यामुळे त्या तिघांना, आणि त्या अनुषंगाने आपल्याला ही अनुभूती झाली, त्याबद्दल बोलू.

अर्जुन, ज्याने कामाला वाहून घेतलंय. चाळीशीपर्यंत पैसा कमवायचा आणि रिटायर व्हायचं, एवढंच त्याचं ध्येय. परंतु 'सिझ दि डे माय फ्रेंड' चा मंत्र देताना जेव्हा लैला 'तुला कसे माहीत, तू चाळीशीपर्यंत जिवंत राहशील?' हा प्रश्न विचारते तेव्हा तो निरुत्तर होतो. डीप सी डायविंग नंतर बॅकग्राउंडमध्ये फरहानच्या आवाजात 'पिघले नीलम सा बेहता हुवा ये समा' चालू असतं तेव्हाही अर्जुनच्या डोळ्यातून पाणी येतं, त्याने जगलेला तो निर्वाना मोमेंट त्याला अंतर्बाह्य रिज्युविनेट करतो आणि त्याला स्वतःच्या अस्तित्वाची आणि अंतरिम आनंदाची अनुभूती होते. लैलाच्या आयुष्यात येण्याने अर्जुनला, केवळ पैसा कमावणे म्हणजे आनंद नाही याची खऱ्या अर्थाने जाणीव होते.

इम्रान ज्या सिक्रेट मिशनवर आलेला असतो त्या अनुषंगाने तो त्याच्या बायोलॉजिकल (आणि बऱ्याच अर्थाने लॉजिकलही) फादरला भेटतो. सलमान हबीब, एक स्ट्रेट फॉरवर्ड, बिनधास्त आणि लॉजिकल माणूस. आपल्या टर्म्सवर आयुष्य जगण्यासाठी त्याने इम्रानच्या आईच्या, रेहलाच्या आयुष्यातून जाण्याचा निर्णय घेतलेला असतो, ती प्रेग्नन्ट असताना. खरं तर चूक कुणाचीच नसते. दोघांनीही आपापले मार्ग निवडले असतात, रेहलाला त्यांच्या प्रेमाचं प्रतीक महत्वाचं होतं, तर सलमानला घर आणि जबाबदारीतून बाहेर पडून त्याचं पेंटर बनण्याचं स्वप्न. सलमान आणि इम्रान समोरासमोर उभे ठाकतात, हा सीन चित्रपटातील महत्वाच्या सीन्सपैकी आहे आणि सर्वात जास्त प्रभाव पडणारा देखील आहे. एका बापाकडून सत्य ऐकण्यासाठी आतुर असलेल्या इम्रानला, सलमान, सत्याचं स्वतःचं व्हर्जन सांगतो आणि त्याला स्वतःची चूक लक्षात येते. इम्रानची बापाकडून निरागस अपेक्षा, सलमानचे टू दि पॉईंट जस्टीफिकेशन्स आणि अखेर, या माणसासाठी आपण आईला खरे खोटे सुनावले याची इम्रानला झालेली उपरती, हा सगळा इमोशनल ड्रामा चित्रपटाचा पीक पॉईंट आहे.

कबीर, हा टिपिकल फॅमिली मॅन आहे. फॅमिली बिझनेस सांभाळणारा, फॅमिली फ्रेंड्ससोबत रमणारा. अश्यातच एका गैरसमजुतीत तो नताशाशी एंगेज झालाय. हा निर्णय मनापासून घेतलेला नसला तरी सुरुवातीला त्याने तो स्वीकारलेला आहे. पण आत कुठेतरी तो अस्वस्थ आहे. तो ज्या नताशाला ओळखत होता, ती ही नाहीये. आधी जी त्याला इंडिपेंडंट वाटत होती, ती लग्नानंतर जॉब सोडून घरी बसण्याच्या गोष्टी करते, जे त्याला पटत नाही. दोघांचे छोट्या छोट्या गोष्टींवरून खटके उडतात, तिचं वागणंही वेळोवेळी त्याला खटकतं. त्याची असहायता त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत राहते. या निर्णयाचा पुनर्विचार करण्याचा विचारही तो करत नाही, कारण स्वतःच्या सुखापेक्षा नताशा, शिवाय दोघांच्या परिवाराचा विचार तो करतोय. बुल रेसच्या आधी ही गोष्ट जेव्हा अर्जुन आणि इम्रानला समजते, तेव्हा यातून वाचलो तर प्रत्येक जण काय करणार हे तिघे ठरवतात. त्यावेळेस कबीर त्याच्या मनाचा कौल घेत बुद्धीच्या विचारांच्या गुंत्यातुन वाट काढत, यातून वाचल्यानंतर नताशाला 'सॉरी, मी तुझ्याशी लग्न नाही करू शकत'  हे स्पष्ट सांगण्याचा निश्चय करतो.

ही फक्त एक रोड ट्रिप न ठरता, त्या तिघांच्याही आयुष्याच्या रेषेचा एक असा महत्वाचा अल्पमुक्कामाचा बिंदू ठरते, की जिथून त्यांच्या आयुष्याने एक वेगळे वळण घेते. खरे तर आपल्या आयुष्यातही अशी वेळ येते, जेव्हा घेतलेले निर्णय आपलं आयुष्य सुकर करू शकतात, परंतु परिस्थितीनुसार ते निर्णय घेणे शक्य असतेच, असे नाही. फार कमी वेळा इतरांचा विचार न करता, आपण स्वतःला, स्वतःसाठी जगण्याचा विचार करायला भाग पाडतो.

झोया अख्तर , या नावाला पटकथालेखक-गीतकार जावेद अख्तर यांची कन्या किंवा वर्साटाईल फरहान अख्तर याची बहीण, या ओळखीची आवश्यकता नाहीये. फारसा चालला नसला, तरीही नवोदित दिग्दर्शक म्हणून 'लक बाय चान्स' एक चांगला अटेम्प्ट होता. लक बाय चान्सला प्रेक्षकांनी नाकारल्यानंतर आलेल्या 'जिंदगी ना मिलेगी दोबारा', 'बॉम्बे टॉकीज' आणि 'दिल धडकने दो' या चित्रपटांनी समीक्षक आणि बॉक्स ऑफिस अश्या दोन्ही पातळीवर झोयाच्या नावाची दखल घेतली गेल्याने ती सध्याच्या प्रॉमिसिंग दिग्दर्शकांच्या यादीत जाऊन बसली आहे. नुकत्याच आलेल्या 'लस्ट स्टोरीज' मधल्या कामाचंही कौतुक होत आहे.

झोया अख्तरच्या पूर्ण लांबीच्या चित्रपटांची खासियत म्हणजे, ते कॅरेक्टर ओरिएंटेड असल्याने प्रत्येक पात्राला स्वतःचं अस्तित्व आणि महत्व पटवून द्यायला पूर्ण वाव असतो, ज्यातून कथेचे अनेक पदर उलगडत जातात. शिवाय ही गोष्ट अगदी कथा आणि संवाद लिहिण्यापासून पक्की गृहीत धरून पात्रे डिफाईन केली जातात. सहलेखक रीमा कागती आणि झोया यांची ऑफस्क्रिप्ट बॉंडींग जितकी पक्की आहे तितकीच ऑनस्क्रिप्ट केमिस्ट्रीही अफाट आहे हे या दोघींनी लिहिलेल्या, 'जिंदगी ना मिलेगी दोबारा' आणि त्यानंतर आलेल्या 'दिल धडकने दो' बाबतीतही प्रकर्षाने पहायला मिळाली.

'दिल चाहता हैं' ने आयुष्यातील मैत्री आणि प्रेम यांचे महत्व पटवून दिले, त्यानंतर दशकभराने आलेल्या 'जिंदगी ना मिलेगी दोबारा' ने एक पाऊल पुढे टाकत या दोन्ही सोबतच, रेतीसारखं सुटत जाणाऱ्या आणि एकदाच जगायला मिळणाऱ्या आयुष्याचंही महत्व समजून दिलं.

मागच्या आठवड्यात या चित्रपटाला सात वर्षे झाली तरीही तो मनात अजूनही तितकाच ताजा आहे.

- राज जाधव  (१५-०७-२०१८)

Comments

Popular Posts