समीर

जन्म त्यावेळेसच्या बनारसमधला. बँकेत चांगल्या पगाराचा जॉब, पण मन रमत नसल्यामुळे ८० च्या दशकात तो मुंबईत दाखल झाला. बाप नावाजलेला गीतकार असल्यामुळे तसं त्याला या क्षेत्रात करियर करायला अडचण आली नसेल, असं बर्याच लोकांना वाटत असलं तरी, ते इतकं सोप्पं नव्हतं.

अंजान यांनी समीरला कधीही काम मिळवण्यासाठी शिफारस केली नाही वा ती करावी अशी समीरची अपेक्षाही नव्हती. स्ट्रगलिंगच्या काळातले जे चटके अंजान यांनी सोसले त्याची जाणीव असल्यामुळे, समीरने या क्षेत्रात येणे त्यांना प्रथमदर्शी पटले नव्हते. परवानगी देण्याआधी त्यांनी समीरला असा एक प्रश्न विचारला की त्याने तोही जरासा चक्रावला. 'तू कधी कुणावर प्रेम केलं आहे का? आणि का?' भांबावलेल्या समीरने 'हो केलंय आणि प्रेम काही ठरवून होत नाही' असं उत्तर दिलं. यावर ते त्याला म्हणाले, 'असंच निरपेक्ष प्रेम या इंडस्ट्रीवर ही कर, बदल्यात प्रेम मिळो अथवा ना मिळो, करत रहा'.

चित्रपटातील गीतलेखनाच्या बाबतीत पण एक मजेशीर कहाणी आहे. स्वतःच्या स्ट्रगलिंगच्या काळातील एक आठवण समीर सांगतात. ज्या वेळी समीर स्वप्नांची पोटली घेऊन मुंबईत वडिलांकडे दाखल झाले होते, त्या वेळी गीतलेखनामध्ये अंजान हे एक नावाजलेलं नाव होतं आणि त्यांच्याकडे बऱ्याच सुप्रसिद्ध संगीतकारांचे येणेजाणे असायचे. त्यावेळी अंजान यांनी, "हा माझा मुलगा आहे, तुमची हरकत नसेल तर यालाही आपल्या सोबत बसू द्या", म्हणत प्रत्येक बैठकीला समीर यांनाही बसवलं. पण खरं तर अंजान यांनी समीरला दिलेली ही एक कामगिरी होती, हे फक्त त्या दोघांनाच माहित होतं.

ते असं की, संगीतकारांसोबत जी चर्चा होते, ती त्याने लक्षपूर्वक ऐकायची, त्यांना कोणत्या प्रकारचं गीत हवं आहे ते जाणून घ्यायचा प्रयत्न करायचा आणि त्याच्या पद्धतीने जे योग्य वाटेल तसे गीत लिहून काढायचं. अंजान स्वतःही वेगळे गीत लिहिणार होते, मात्र संगीतकारांना देताना दोन्ही त्यांचीच गीते आहेत म्हणून सोपवणार होते. अंजान यांना आपल्या मुलावर विश्वास तर होताच पण त्याने सर्व स्वतः कमवावं अशी एका बापाची प्रामाणिक अपेक्षा होती. ते पुढे समीरला म्हणाले की, ज्या दिवशी एखादा संगीतकार माझ्याऐवजी तुझं गीत पसंत करेन, त्या दिवशी तू माझ्यासाठी गीतकार होशील. आणि साधारण २ ते ३ वर्षांनी एक दिवस तो सुवर्णक्षण आला आणि समीर ऑफिशियली गीतकार बनला. पण नावाजलेला गीतकार होण्यासाठी त्याला बरीच वर्षे वाट पहावी लागली, तत्पूर्वी बऱ्याच घडामोडी घडल्या. रातोरात काही होत नसतं, झालंही नाही आणि झालंच तर ते क्षणभंगूर असतं.

स्ट्रगलिंगच्या काळातच समीर यांची आनंद मिलिंद या जोडगोळीशी मैत्री झाली. अंजान यांचे संगीतकार मित्र चित्रगुप्त यांची ती दोन मुलं. समीरप्रमाणे, हे दोघंही या क्षेत्रात येण्यासाठी धडपडत होते. चित्रपटात येण्यापूर्वीपासून हे तिघं मिळून गाणी कंपोज करत. पुढे जाऊन त्यांनी एकत्र बरीच कामं केली.

१९८३ पासून गीतकार म्हणवून घेणारा समीर ९० नंतर खऱ्या अर्थाने नावारूपाला आला तो दिल आणि आशिकीमुळे. मग त्याच्यानंतर त्यांने कधीही मागे वळून पाहिलं नाही. ९० च्या दशकातील जवळपास ९०% हूनही जास्त चित्रपटात Lyrics Sameer हे वाचायची इतकी सवय झाली होती की, त्या काळात अजून कुणी गाणी लिहीत होतं की नाही, इथवर शंका यावी.

समीर ने १०० हून अधिक संगीतकारांसोबत काम केले असले तरी, त्याच्या सुरुवातीच्या यशात आनंद मिलिंद आणि नदीम श्रवण (सोबत कुमार सानू) तर पोस्ट ९० आणि २००० च्या दशकामध्ये जतीन ललित, अनु मलिक आणि हिमेश यांचा महत्वाचा वाटा आहे असं म्हणायला हरकत नाही.
पण बदल हा सृष्टीचा नियम आहे आणि इंडस्ट्री कालांतराने प्रत्येकाला बाहेर फेकून देते ही इथली ट्रैजेडी आहे. आनंद -मिलिंद, अनु मलिक (दम लगा के हैशा आणि बेगम जान हा सॉलिड कम बॅक असला तरी) नदीम श्रवण (वेगळ्या कारणामुळे असेलही, तरी) आणि जतीन ललित हे इंडस्ट्रीतून हद्दप्पार होत होते. शिवाय, हळू हळू बरेच नवीन गीतकार आणि संगीतकार मंडळी इंडस्ट्रीमध्ये दाखल होत असताना, बदललेला ट्रेंड लक्षात घेऊन समीरने स्वतःचा फॉर्म्युला बदलून नवीन जेनरेशनला सूट होतील अशी गाणी लिहायला सुरुवात केली.

१९९८ नंतरचा प्रवास म्हणजे बर्याच अर्थाने त्याची सेकंड इनिंग म्हणता येईल. कारण, जुने मित्र आनंद मिलिंदना कामं मिळत नव्हती, गुलशन कुमार केसमुळे नदीम श्रवणही भारताबाहेर गेले होते आणि पिता अंजानही त्याला सोडून अनंतात विलीन झाले होते. तो काहीशा निराशेच्या गर्ततेत जाण्याच्या मार्गावर होता. यादरम्यान यश चोप्रा ने त्याला बोलावून करण जोहरच्या नव्या चित्रपटासाठी विचारलं. जावेद अख्तर यांना 'कुछ कुछ होता हैं' हे नाव न आवडल्यामुळे करणला नकार दिला आणि ही संधी समीरकडे चालून आली, इथून त्याची दुसरी इंनिंग सुरु झाली होती. त्यानंतर रेस, वेलकम, नो एंट्री, धूम, तेरे नाम,ऐतराज, RHTDM, सावरीया, फालतू मधलं चार बज गये किंवा राउडी राठोड , खिलाडी 786, सनम तेरी कसम मध्ये त्याने त्याचा जॉनर बदलला (सर्वच गाणी उत्कृष्ट होती, असं नाही पण चालली, त्याला एक्सटेन्शन मिळत गेलं).

पिता अंजान हे त्यांचे आदर्श तर होतेच, पण समीरला खरी भुरळ पाडली ती आनंद बक्षी आणि मजरूह सुल्तानपुरी यांच्या शब्दांनी. या दोघांना ते गुरुस्थानी मानत. आपल्या प्रत्येक चांगल्या कामानंतर समीर बक्षीसाहेबांना विचारत, आणि ते एवढेच म्हणत, 'अच्छा कर रहे हो बेटा, और मेहनत करो', आणि दर वेळी निराश होऊन समीर स्वतःलाच म्हणत , अजून काय करायला हवंय? पण एके दिवशी स्वतःहून बक्षीसाहेबांचा फोन आला आणि त्यांनी समीरच्या 'तेरे इश्क में नाचेंगे' या गाण्याबद्दल त्याची तारीफ केली. त्यांना हे गाणं का आवडलं हे त्याला समजू शकलं नाही, पण तो त्यांच्या उत्स्फूर्त अभिप्रायाने नक्कीच भारावला.

अशीच एक आठवण मजरूह साहेबांची पण तो आवर्जून सांगतो, १९९३ च्या फिल्मफेयरच्या वेळी समीर 'दिवाना' साठी आणि मजरूह सुल्तानपुरी 'जो जिता वही सिकंदर' साठी नामांकित होते. हा पुरस्कार समीरला मिळाला होता, पण नामांकनाची घोषणा करताना मजरूह साहेबांचे नाव घेतले गेले, आणि मजरूह साहेबांचा गैरसमज झाला की पुरस्कार त्यांनाच मिळाला आहे आणि ते जागेवरून उठून चालू लागले. काय झालंय हे कळेपर्यंत ते स्टेजवर पोहोचले होते. अशा परिस्थितीत काय करावे हे समीरला कळत नव्हते, पण त्याला स्टेजवर जाणं तर भाग होतं. प्रसंगावधान राखून तो स्टेजवर गेला आणि हा पुरस्कार माझ्या गुरुकडून मिळतोय याचा मला आनंद आहे, असे म्हणून तो पुरस्कार त्याने मजरूह साहेबांकडून स्वीकारला.

समीर आणि आनंद बक्षी यांच्यामध्ये अजून एक समान धागा वाटतो. जसं आनंद बक्षी हे नाव ७०-८० च्या काळात प्रत्येक चित्रपटाच्या नामावलीत येत असतानाही त्यांना गीतलेखनाच्या बाबतीत कंपेरेटीवली एक दुय्यम स्थान मिळत आलं आहे, तसंच काहीसं समीरचं ९० +च्या दशकात झालं आहे.

मी मान्य करतो की समीरची गाणी लिरीकली बेस्ट कॅटेगरीत मोडत नसतील, वेगळ्या-जड-उर्दूईश शब्दांचा वापर नसेलही, पण साध्या शब्दात त्याने बर्याच वेळा कमाल केली आहे. आजपर्यंत तिसेक वर्षांत चार ते पाच हजार (गिनीस रेकॉर्ड) हून जास्त गाणी लिहिली असताना, प्रत्येक गाण्यात कमाल करणं शक्य नाहीये हे स्वीकारायला हवं.
शिवाय रिसोर्सेस न वाढता फक्त डिमांड वाढत गेली तर दर्जावरही परिणाम होतो हेही तितकंच खरं आहे. त्याचं नाव होतं, त्याला कामं मिळत गेली, सोपे शब्द असल्यामुळे लोकांच्या तोंडी सहजासहजी तरळत राहायची त्याची गाणी, याचा त्याला फायदा झाला, मान्य; पण येणारा प्रत्येक बॉल अटेंड करणंही महत्वाचं होतं, एकेरी दुहेरी काढत का होईना त्याने ते केलं. त्याचा स्कोरबोर्ड हलता राहिला हे कमी महत्वाचं नव्हतं, नाहीये. अधेमधे चौकार षटकार पण मारलेच की.
जिथे नावाजलेले गीतकार वर्षाकाठी एक-दोन सिनेमे करून कायमचे स्मरणात राहतात तिथे एका वर्षात पाच-सहा सिनेमात कंसिस्टंटली गाणी लिहिणारे टेम्पररी गुणगुणले जातात, ही शोकांतिका आहे.

असो, शेवटचं एवढंच सांगतो की, समीर, तू माझ्या (आणि इतर बर्याच जणांच्याही) फेवरीट लिरिसिस्ट या केटेगरीत कधीही नव्हता, नसशीलही कदाचित. तुझं विशिष्ट एखादं गाणं आवडतं म्हणून असं एकदम ओठावर येणारही नाही, पण त्याने तुझी अचिवमेंट कमी होत नाही. आणि आज आम्ही कितीही फुशारक्या मारत साहिर, गुलजार, अख्तर म्हणून बोंबलत असलो तरी कोणे एके काळी तुझी गाणी आवडलेली आहेत, पाठ केली आहेत, मनापासून गायलोही आहे.
तुझ्या कमिटमेंट, डेडिकेशन आणि कंसिस्टन्सीला मनापासून सलाम.

- राज जाधव (०४-०५-१६)

Comments

Popular Posts